१२ सप्टेंबर पर्यंत करूळ घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

सिंधुदुर्ग
करुळ घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग १२ सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे दगड आणि चिखल रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांच्याकडून ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, या घाटात यापूर्वीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. यामुळे सैल झालेले खडक हटवणे आवश्यक आहे. या कामासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची टीम बोलावण्यात आली असून, हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. दरम्यान नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता, जिल्हादंडाधिकाऱ्यांनी हा महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली आहे. संबंधित विभागाने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता आणि पर्यायी मार्गांची माहिती दर्शवणारे फलक व वाहतूक चिन्हे लोकांच्या निदर्शनास आणून द्यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.