शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा केल्यास होणार कारवाई

शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा केल्यास होणार कारवाई

 

मुंबई
 

      राज्यातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वाढदिवस साजरा करत असल्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जावून त्या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत, नागरिक यांना त्यांचे कामासाठी ताटकळत राहावे लागते. अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम १९७९ नुसार शिस्तभंगाचा प्रकार आहे. यासाठी डॉ.सुहास दिवसे (भा.प्र.से.) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे, यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले असून भूमी अभिलेख विभागाच्या सर्व कार्यालयात यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ वा वाढदिवस शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आदेशित केले आहे.विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ कार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनांस आल्यास त्या अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचे नियंत्रण अधिकारी यांनी तात्काळ समज द्यावी.तसेच भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अशा अनुचित बाबी यापुढे घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही ह्या परिपत्रकांत नमूद केले आहे. हे आदेश केवळ भूमी अभिलेख विभागच नव्हे तर राज्य शासनाच्या सर्वच शासकीय विभागांना लागू होत असल्याने आता फक्त त्याची प्रभावीपणे अंमल बजावणी होणे महत्वाचे आहे.