देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा बंद

देवगड
देवगड - जामसंडे शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबांव पूरक नळयोजनेच्या जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच असून आठ दिवसातच पुन्हा जलवाहिनी फुटल्याने देवगड - जामसंडेचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, वरचेवर पाणीपुरवठा बंद पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जलवाहिनी फुटल्यानंतर खराब झालेली जलवाहिनी नवीन टाकावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.सध्या उष्याचा पारा वाढला आहे, यामुळे पाण्याची पातळी खाली जात असल्याने देवगड-जामसंडेमधील विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत.देवगड-जामसंडेमधील बहुतांश नागरिक हे पाण्यासाठी नळ योजनेवरच अवलंबून आहेत.पाण्यासाठी काही खासगी विहिरी वगळता इतर स्त्रोत नाही. यामुळे नळयोजनेचे पाणी हे देवगड - जामसंडेवासीयांसाठी महत्वाचे आहे. गेली कित्येक वर्षाची नळयोजना आता सक्षम करणे गरजेचे आहे. ही जलवाहिनी बदलणे आवश्यक आहे. टंचाईचे महिने आता जवळ येत आहेत. अशा स्थितीत वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीची स्थिती अशीच राहिल्यास देवगड-जामसंडेवासीयांचा पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.