गडगडी धरण कृती समितीच्यावतीने २ जुलैचा देवरूखमधील जलआक्रोश मोर्चा स्थगित.

गडगडी धरण कृती समितीच्यावतीने २ जुलैचा देवरूखमधील जलआक्रोश मोर्चा स्थगित.

रत्नागिरी.

   गडगडी धरण कृती समितीच्या वतीने मंगळवार, दिनांक २ जुलै, २०२४ रोजी देवरूख येथे जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष घाग यांनी दिली आहे.
    संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गडगडी धरण प्रकल्पाचे सुधारित स्ट्रक्चरल डिझाईन पूर्ण होऊन ते संमत होण्याच्या मार्गावर आहे व लवकरच ते आपल्याशी शेअर केले जाईल व त्यावर गडगडी धरण कृती समितीबरोबर चर्चाही केली जाईल, तसेच धरणाबाबतची त्यापुढील कामेही जलद गतीने चालू ठेवली जातील, असा शब्द शासकीय अधिकाऱ्यांकडून गडगडी धरण कृती समितीला देण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यमान स्थानिक खासदार  माननीय नारायण राणे साहेब यांचे शिफारस पत्र जलसंपदा विभागाकडे पोहोचले आहे.
    तसेच विद्यमान स्थानिक आमदार शेखर निकम साहेब याबाबत सहकार्य करत आहेतच. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांतील माजी आमदार-खासदार व विविध राजकीय पक्षांतील समस्त नेतेमंडळीही राजकारण आणि पक्षभेद बाजूला ठेवून धरणासाठी मनापासून सहकार्य करत आहेत. या सर्वांमुळे समितीच्या आंदोलनाला बळकटी मिळत आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या शब्दाचा मान ठेवून सध्या त्यांना काम पुढे नेण्याची संधी द्यावी आणि आपला प्रस्तावित मोर्चा सध्या पुढे ढकलण्यात यावा, असे ठरविण्यात आले. मात्र सर्वांनी विविध प्रकारे जीव ओतून मोर्चाची तयारी केलेली होती. दशक्रोषीतील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतींचे सभासद, सर्व सन्माननीय स्त्री-पुरुष-तरुण-जेष्ठांनी गावा-गावांत, वाडी-वाडींत जावून आंदोलनाचे महत्त्व पटवून देत होते, ग्रामदेवतेच्या वारीप्रमाणे २ जुलैचा दिवस मोर्चासाठी समर्पित राखून ठेवलेला होता. 
    तर मुंबईस्थित ग्रामस्थांनी नोकरी-धंद्यावरून सुट्या टाकून, तिकिटांची-गाडी-घोड्यांची पूर्ण व्यवस्था करून जंगी तयारी केली होती. या सर्वांना समितीच्या वतीने मनापासून अभिवादन आणि धन्यवाद देण्यात येत आहेत. एवढे करूनही आपल्याला थांबावे लागत आहे, त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र ही तयारी वाया गेलेली नाही, हे नक्की. उलट याच जंगी तयारीमुळे आपली मागणी मान्य होत आहे. मात्र लढा अजूनही संपलेला नाही. यातली बरीचशी तयारी पुढील आंदोलनासाठी उपयोगी पडणार आहेच. त्यामुळे असाचा उत्साह, आत्मविश्वास, परस्परांवरील विश्वास आणि एकता-एकवाक्यता धरण पूर्ण होईपर्यंत अखंड, अविचल ठेवावी, असे आवाहन समितीने केले आहे. मात्र जर वेळ देऊनही काम पुढे गेले नाही, तर नंतर मोर्चा योग्य वेळी न्यावाच, तसेच आंदोलनाचे अन्य पर्यायही अवलंबावेत व  आंदोलन तीव्र करावे, अशा सूचना मान्यवरांकडून येत आहेत, असे गडगडी धरण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.