वेताळ प्रतिष्ठान तर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन.

वेंगुर्ला.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने सलग दहाव्या वर्षी 'अश्वमेध' मोहोत्सवातंर्गत खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा 'खुल्या' व 'शालेय' अशा दोन गटात आयोजित केलेली आहे.
काळाच्या विशिष्ट टप्प्यावर एखाद्या क्षेत्रामध्ये क्रांती होत असते. आजच्या घडीला हातात मावणाऱ्या मोबाईल ने अक्षरशः समाजाला वेड लावले असून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम समाजावर झालेले दिसत आहेत.आपल्या देशात युवकांची संख्या प्रचंड असून ही अभिमानास्पद गोष्ट असली तरी आजचा युवक हा इंटरनेटच्या मायाजालात अडकलेला आहे हि वस्तुस्थिती आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून दिला जाणारा दररोजचा दीड जीबी आणि जास्तीचा डेटा या युवक-युवतींना आपण बेकार असल्याची जाणीव करून देत नाही. हा दीड जीबी डेटा युवाईची वाताहत करणारा तर ठरत नाही ना? की व्यवसाय आणि नोकरी संधी कमी पडत आहेत म्हणून डेटा पटापट संपत आहे?ऑनलाइन जुगार आणि आक्षेपार्ह वेबसाईट मद्ये युवक गुंतून पडला आहे का? अशा अनेक मुद्यावर विचारमंथन करण्यासाठी ' दररोजचा दीड जीबी डेटा : बेरोजगारीची न होणारी जाणीव' हा खुल्या गटासाठी निबंध लेखनाचा विषय आहे.
तसेच आज समाजामध्ये आदर्श कोणाला म्हणावे हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा अशा सगळ्याच आघाड्यावरती आदर्श दुर्मीळ होत असून सक्षम पर्याय दिसतच नाही. ज्ञानार्जन करणारे शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात, त्यांना दिशा देत असतात.पण वर्तमान स्थितित 'आदर्शा'ची व्याख्या बदलली असून तथाकथित सेलिब्रिटी हे आदर्श होऊ शकतात का? यांच्याकडून समाजाने नेमका काय आदर्श घ्यावा? खरचं आजचा शिक्षक अपेक्षापूर्ती करण्यासाठी कमी पडतो आहे का? की संस्कार कमी झाल्यामुळे आदर्शाची व्याख्या बदलली आहे? या विषयावर व्यक्त होण्यासाठी आमचे आदर्श कोण? शिक्षक की सेलिब्रिटी हा निबंध स्पर्धेचा विषय शालेय गटासाठी आहे.सदर शालेय गट हा इयत्ता दहावी पर्यंत आहे.
स्पर्धेतील खुल्या गटास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम रु १०००, रु ७००; रु ५०० आणि शालेय गटास रु ७००, रु ५००,रु ३०० व प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
सहभागी स्पर्धकांनी निबंध कागदाच्या एका बाजूला स्व:हस्ताक्षरात (खुला गट: किमान १०००शब्द, शालेय गट: किमान ५०० शब्द) लिहून वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस द्वारा- प्रा.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, खरीवाडी, पिन ४१६५१५, (मोबा.९४२१२३८०५३) या पत्त्यावर दि.०१ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावा.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.