नवाबाग येथिल निष्कृष्ट कामांबद्दल वेंगुर्ला मच्छीमार सोसायटीचे २६ जानेवारीला आंदोलन.

नवाबाग येथिल निष्कृष्ट कामांबद्दल वेंगुर्ला मच्छीमार सोसायटीचे २६ जानेवारीला आंदोलन.


    नवाबाग मांडवी खाडीच्या व समुद्राच्या संगमा जवळ मच्छिमारांच्या हितासाठी बांधण्यात आलेला ब्रेक वॉटर बंधारा तसेच बोट यार्ड हे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहे. तसेच इतर गाळ काढणे, अप्रोज रोड, जेटी विस्तारीकरण, सोलर स्ट्रीट लाईट या कामांचीही मुदत संपली असतानाही ती अर्धवट स्थितीत आहेत. मच्छीमारांची दिशाभूल करून ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असा आरोप वेंगुर्ला मच्छिमार सोसायटीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी आपण २६ जानेवारीला होणाऱ्या उपोषणावर आम्ही ठाम आहोत. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि शासनाच्या नियमात काम पूर्ण झाले पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. वेंगुर्ला मच्छिमार सोसायटीच्या वतीने आज गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.             
     यावेळी वेंगुर्ला मच्छीमार सहकारी सोसायटी चेअरमन सागर म्हाकले, व्हाईस चेअरमन आनंद वेंगुर्लेकर, संचालक अनंत उर्फ दादा केळुसकर, प्रकाश मोटे, निलेश खडपकर, मनोज कुबल, आयेशा हुले, सीमा पराडकर, विनायक केळुसकर, सचिव हितेंद्र रेडकर याबरोबरच मच्छीमार हरेश खराडे, सत्यवान सारंग, मुकुंद खडपकर, हरीश तांडेल, मंदार टांककर, श्रीकांत तांडेल आदी उपस्थित होते. वेंगुर्ले बंदर ते मांडवी खाडीच्या मार्गात सातत्याने वाळू (गाळ) साचल्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या होड्यांपासून ट्रॉलर पर्यंतच्या नौकांना खाडीत येण्याचा व खाडीतून समुद्रात जाण्याची समस्या गंभीर बनली होती. म्हणून शासनाकडे वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेच्या मार्फत मच्छीमारांनी केलेल्या मागणीनुसार सुमारे ३३ कोटी च्या विकास कामांचे निधीस शासनाने मंजुरी दिली होती. त्यातील ब्रेक वॉटर बंधारा हे सुमारे २६ कोटीचे काम झुलत्या पुलाच्या नवाबाग येथील कोपऱ्याकडून चालू करून तो बंधारा दक्षिणेस खोल समुद्रात जाईल असा ५०० मीटर अंदाजपत्रकात होता. असे असताना चुकीच्या पद्धतीने सरळ रस्त्याप्रमाणे हा बंधारा केला गेल्याने सुमारे ३८० मीटर पर्यंत तो करून थांबविला गेला. जर तो तसाच ५०० मीटर नेला तर वेंगुर्ले बंदर व जेटी कडे जाण्या-येण्याचा नौकानायनाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असता. ही परिस्थिती चुकीच्या पद्धतीने ठेकेदाराने केलेल्या कामामुळे घडलेली आहे. या बंधाऱ्याचे काम करताना जे पारंपारिक मच्छीमार या भागातून मच्छीमारी करतात त्यांना तसेच वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्था यांना विश्वासात न घेता केलेल्या कामामुळे चुकीच्या पद्धतीचे काम व निकृष्ट काम झालेले आहे. तसेच इतर कामे सुद्धा शासनाने मंजूर केलेल्या निधीप्रमाणे अंदाजपत्रकातील कामाप्रमाणे झालेले नाहीत. हे काम ठेकेदार करताना या कामावर लक्ष न देणारे मत्स्य विभागाचे बांधकामा अभियंता हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित न राहिल्याचा हा परिणाम आहे. ब्रेकवॉटर बंधारा कशा पद्धतीने करण्यात यावा याबाबत काम करणाऱ्या ठेकेदाराला स्थानिक मच्छीमारांनी व मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले होते. मात्र काम करणाऱ्या ठेकेदाराकडून काम करतेवेळी सूचनेकडे दुर्लक्ष केल. यामुळे चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचा ब्रेक वॉटर बंधारा आणि तोही अर्धवट असल्याचा आरोप वेंगुर्ला मच्छीमार संस्थेचे चेअरमन सागर म्हाकले यांच्यासह संस्थेच्या संचालक मंडळाने केला आहे. शासनाने मंजूर केलेल्या या कामामुळे मच्छीमारांचा फायदा होणार आहे मात्र चुकीचे काम होत असल्याने याचा धोका भविष्यात मच्छीमारांना होणार आहे. ते काम सुस्थितीत मच्छीमारांना आवश्यक आहे तसे व्हावे यासाठी आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे त्यांनी सांगितले.