'टीम इंडिया' म्हणून एकत्र काम करत संकटावर मात करू : पंतप्रधान मोदी

'टीम इंडिया' म्हणून एकत्र काम करत संकटावर मात करू : पंतप्रधान मोदी


 

नवी दिल्ली

 

    'टीम इंडिया' म्हणून एकत्र काम करत संकटावर मात करू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पश्चिम आशियातील उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाची तयारी आणि संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत केंद्र आणि राज्यांमधील समन्वय, पुरवठा साखळी, ऊर्जा सुरक्षा आणि नागरिकांच्या हितसुरक्षेवर विशेष भर देण्यात आला. दरम्यान, या बैठकीत सहभागी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. या बैठकीमध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना एका विशेष सादरीकरणाद्वारे पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल अवगत करण्यात आल्याचेही समजते.पंतप्रधानांनी 'टीम इंडिया'च्या भावनेतून एकत्र काम केल्यास देश हे आव्हान यशस्वीपणे पार करेल, असा विश्वास व्यक्त केला. कोरोना काळातील अनुभवाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्यांनी समन्वयाने काम करत पुरवठा साखळी आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवली होती. त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थितीतही काम करण्याची गरज आहे.सद्यस्थिती गतिमान असून, सातत्याने निरीक्षण आणि तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 3 मार्चपासून आंतरमंत्रालयीन गट दररोज परिस्थितीचा आढावा घेत असून, आवश्यक उपाययोजना करत असल्याची माहिती त्यांनी दिली.परदेशातील विशेषतः पश्चिम आशियातील भारतीय नागरिकांसाठी संबंधित राज्यांनी हेल्पलाईन सुरू करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे आणि जिल्हास्तरावर साहाय्य यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले. उद्योग व सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी सातत्याने संवाद ठेवून उत्पादन आणि रोजगार स्थिर ठेवण्यावरही भर देण्यात आला. पर्यायी ऊर्जेच्या वापराला चालना देणे, सौरऊर्जा, जैवइंधन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा वाढवण्यासोबतच देशांतर्गत तेल-गॅस शोधमोहीम वाढवण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.