जिवात जीव असेपर्यंत सिंधुदुर्गच्या विकासासाठी काम करेन - आमदार निलेश राणे

कुडाळ
लोकसभेच्या निवडणुकीत सलग दोन पराभव झाल्यानंतर कोणीही राजकारणापासून बाहेर फेकला गेला असता. मात्र, दहा वर्षांच्या वनवासानंतर सिंधुदुर्गातील जनतेने पुन्हा तेच प्रेम देत मला आमदार म्हणून विधानसभेत पाठवल. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियांचे हे ऋण आजन्म विसरणार नाही जिवात जीव असेपर्यंत सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करेन, असा विश्वास कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. कुडाळ येथील आभार सभेत उपस्थित त्यांना संबोधित करताना त्यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, मला जे काही आज मिळाले आहे ते सहजासहजी मिळाले नाही. यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. समोर कितीही मोठा दिग्गज असला तरी आम्ही लढतच राहिलो. महाभारताच्या युद्धात पांडव असूनही कर्ण दुसऱ्या बाजूला होता त्याच्या नशिबात संघर्षच होता.आम्ही देखील संघर्ष केला मात्र आता ते दिवस संपले आहेत आता आपल्याला फक्त विकास आणि विकास करायचा आहे.आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या कपाळावर भगवा टिळा लावला. विजयी झाल्यावर त्यांनी गुलालही लावला. त्यामुळे माझ्या पडत्या काळात ज्यांनी मला साथ दिली त्या माझ्या नेत्याला कधीही सोडणार नाही एक वेळ घरी बसेल पण आता शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्या दिवसापासून केवळ माझ्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण कोकणात शिवसेना वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. माझे सर्व साथीदार त्यासाठी माझ्यासोबत दिवस-रात्र झटत आहेत. त्यामुळेच आजच्या सभेला झालेली गर्दी ही केवळ एक झलक होती भविष्यात संपूर्ण कोकण शिवसेनामय करणार, असा एल्गार त्यांनी केला. काहीजण म्हणतात निलेश राणे यांनी स्वभाव बदलला. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. निलेश राणे आता थांबणार नाही हे लक्षात आल्यामुळे आजही चारही बाजूने माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या गोष्टींमध्ये माझा काडीमात्र संबंध नाही त्यात मला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कितीही टीका करा मी माझा संयम घडू देणार नाही व तुम्ही मला थांबवू शकणार नाही आता ही लढाई तुमची व माझी नसून जनतेच्या विकासाची लढाई आहे त्यामुळे मी काहीही झाले तरी मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज ही आभार यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असताना काश्मीरला जे घडल त्यावेळी सर्व कामा बाजूला ठेवून एकनाथ शिंदे हे आपल्या मराठी माणसांना आधार देण्यासाठी थेट काश्मीरला पोहोचले. कारण मराठी माणूस कोणत्याही राज्यात असला तरीही तो आपला माणूस आहे हे मनाशी बाळगून ते काम करीत असतात. आम्हीही त्यांचाच आदर्श मनात घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे आपल्या माणसांच्या हितासाठी विकासासाठी भविष्यात काहीही कमी पडू देणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आज दत्ता सामंत माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. गेले पाच महिने आम्ही मतदारसंघातील गावन गाव व प्रत्येक घर पिंजून काढत आहोत. जनतेच्या समस्या जाणून घेत आहोत. त्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिवसेना पुन्हा एकदा या मतदारसंघात घराघरात रुजू लागली आहे. त्यामुळे अनेकांना भीती निर्माण झाली आहे. मात्र कोणीही कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरीही हा मतदारसंघ काबीज केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज आमच्या सोबत आहेत. माझ्या मतदारसंघात कुडाळ एमआयडीसी आहे. आज त्यातील अनेक उद्योग बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या एमआयडीसीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी तुमच्या खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी द्यावा असे आवाहन निलेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केले. त्यांनीही त्याला त्वरित प्रतिसाद देत तब्बल ५० कोटी रुपये निधी जाहीर केला.