तब्बल दोन वर्षांनी वायंगणी येथील 'बीएसएनएल' चा मनोरा कार्यान्वित

तब्बल दोन वर्षांनी वायंगणी येथील 'बीएसएनएल' चा मनोरा कार्यान्वित

 


वेंगुर्ला

 

  वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी कार्यक्षेत्रातील हरिचरणगिरी-आवेरे येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचा मनोरा कार्यान्वित झाला. वायंगणी सरपंच आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणी, प्रसंगी आक्रमक पवित्रा आणि पाठपुराव्याने तब्बल दोन वर्षांनी हा मनोरा कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हरिचरणगिरी तिठा-आवेरा येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्याचे काम पूर्ण होवूनही तो कार्यान्वित नव्हता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील अधिकारी कर्मचारी हा विषय गांभीर्याने घेत नव्हते त्यावेळी वायंगणी सरपंच दत्ताराम (अवी) दुतोंडकर, उपसरपंच रवींद्र धोंड, भाजपा सरचिटणीस प्रशांत प्रभुखानोलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, ग्रामपंचायत सदस्य अनंत मठकर, अनंत केळजी, ग्रामस्थ प्रताप करंगुटकर, सुनील प्रभुखानोलकर, विलास मांजरेकर, प्रकाश नागोळकर, सचिन वाडेकर, सत्यवान दुतोंडकर, शशिकांत आसोलकर, श्रीकृष्ण हळदणकर, रवींद्र शिरोडकर, साहिल सावंत, निलेश म्हापणकर, जयेश आकेरकर आदी ग्रामस्थांनी संचार निगम कंपनीच्या विरोधात उपोषण छेडले होते. यावेळी उपोषण मागे घेण्यासाठी  दोन महिन्यात टॉवर सुरु करण्याचे आश्वासन अधिकारी वर्गाकडून देण्यात आले परंतु दोन महिन्यानंतरही टॉवर सुरु करण्यात आला नाही. यावेळी भारत संचार निगम कंपनीच्या अधिकाऱ्यांना सदरचा टॉवर सुरु न झाल्यास आवेरे येथून इतर टॉवरला जाणाऱ्या "ओएफसी केबल" ब्रेक करून सर्व टॉवर सप्लाय बंद करू असा ईशाराच सरपंच व ग्रामस्थांनी दिल्यानंतर तात्काळ संचार निगमच्या अधिकाऱ्यांनी  त्याची दखल घेत सदर टॉवर कार्यान्वित केला त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी येथील परिसराला नेटवर्क मिळाले.