लक्ष्मण हाके यांचे उपोषण अखेर स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर घोषणा.

जालना.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी मागच्या दहा दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. जालन्यात वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु होतं. आज सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतलं. आंदोलनाला आलेल्या आजीच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारच्या शिष्टमंडळाने पटवून दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळात पाच मंत्र्यांसह १२ जणांचा समावेश आहे. आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाल्यानंतर एअर पोर्ट्वरच शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यात वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले.
आपलं आंदोलन दहा दिवसांपासून सुरू आहे. मान्यवर मंडळी आणि शासनाचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. एकदोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावर सरकाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाचं शिष्टमंडळाला विनंती आहे. गेल्या तीन वर्षापासून पंचायत राजमधील आरक्षण पेंडिग आहे. आमची 56 हजार गावे वंचित आहे. एक हजार पंचायत सदस्य भेटून गेले आहेत. शासनाने कोर्टात काही विनंती केली पाहिजे. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. सरकारला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ आम्हाला कळत नाही. त्याला डावललं जात आहे हे समजू नये. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आताचं आंदोलन स्थगित करत आहोत, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
मराठ्यांना कुणबी ठरवून OBC मधून आरक्षण द्याव ही मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. सग्या-सोयऱ्यांनाही आरक्षण द्याव ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. पण यामुळे OBC आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. त्यासाठीच लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस होता. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. सरकारच्या शिष्टमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री आहेत. गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा होते.