ढगाळ हवामानात कशी घेणार आंबा पिकाची काळजी? प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने दिला महत्वाचा सल्ला.

ढगाळ हवामानात कशी घेणार आंबा पिकाची काळजी?  प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने दिला महत्वाचा सल्ला.

वेंगुर्ला.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस हवामान ढगाळ आहे.तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे काही भागात दिनांक ८ व ९ जानेवारी रोजी पाऊस पडला आहे.त्याचा विपरीत परिणाम आंबा पिकावर संभवतो.अनेक आंबा बागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर मोहोर आला असून ज्या भागांमध्ये मोहोर नाही त्या भागांमध्ये मोहोर फुटण्यास सुरुवात झाली आहे.पावसामुळे व धुक्यामुळे पालवीवर तसेच मोहोरावर करपा रोगाची शक्यता आहे. त्यामुळे पालवीवर व मोहोरावर तपकिरी रंगाचे ठिपके उठून पालवी व मोहोर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान ढगाळ असल्यामुळे तुडतुड्याची पैदास मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.तुडतुड्यांनी पालवी व मोहोरातून रस शोषल्यामुळे पालवी व मोहराचे नुकसान होईल.पालवी व मोहोरावर चिकटा पडून त्यावर काळी बुरशी वाढेल.
 अशा परिस्थितीत ज्या बागांमध्ये पहिली फवारणी होऊन 10 ते 15 दिवसांचा कालावधी लोटला आहे.अशा बागांमध्ये डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली दुसरी फवारणी घेण्यात यावी.त्यासाठी 10 लिटर पाण्यात लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 6 मिली व कार्बेनडॅझिम 12 % अधिक मॅन्कोझेब 63 % (तयार मिश्रण ) 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातुन फवारावे.सद्यस्थितीत आंबा फळ पिकासाठी अशा प्रकारची उपाययोजना करणेबाबत सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांनी आवाहन केले आहे.