समतेचा दीपस्तंभ - राजर्षी शाहू महाराज जयंती

''कोल्हापूरच्या राजवाड्यातील भव्य सभागृहात एक तेजस्वी व्यक्तिमत्व उभ होतं-त्याच्या डोळ्यात प्रजेची चिंता, मनात समाजाच्या प्रगतीची आस आणि हृदयात समतेचा अखंड ध्यास. या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या इतिहासात नवा प्रकाश पाडला. जातीपातींचा अंधाऱ्या गर्तेत अडकलेल्या समाजाला शिक्षण, स्वाभिमान आणि नवी अशी किरण दिली. हे होते- छत्रपती राजर्षी शाहू महाराज!" शौर्याचा सूर्य, समाजाचा दीपस्तंभ आणि सामाजिक न्यायाची अमरज्योत- राजर्षी शाहू महाराज! 26 जून हा दिवस केवळ त्यांच्या जन्माचा नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचा सुवर्णपर्व आहे. घाटगे घराण्यात जन्मलेले यशवंतराव, पुढे कोल्हापूरच्या सिंहासनावर आरूढ होऊन ''राजर्षी" या बिरूदाने गौरवले गेले. समाजसुधारणेतील महाराजांचे योगदान हे मोलाचे असून, वयाच्या विसाव्या वर्षी 1894 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतली. सत्ता मिळताच त्यांनी प्रजेच्या हलाखीची पाहणी केली आणि समाजाच्या सर्व स्तरापर्यंत न्याय, शिक्षण आणि विकास पोहोचवण्याचा निर्धार केला. ''फुले- शाहू- आंबेडकरांचा महाराष्ट्र" हा महाराष्ट्राचा सामाजिक समतेचा वैचारिक पाया असून त्यात शाहू महाराजांचे स्थान अग्रगण्य आहे. त्यांनी आपल्या राज्यसत्तेचा वापर केवळ प्रजेच्या हितासाठी, विशेषतः अपेक्षित, वंचित आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केला, त्यामुळे त्यांना ही पदवी लाभली. शाहू महाराज हे केवळ राजा नव्हते, तर समाजाच्या पंखांना बळ देणारे एक युगपुरुष होते. त्यांनी आपल्या राज्यात सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण लागू केले. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांवर दंडात्मक कायदा केला. जातिभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड यावर त्यांनी कठोर प्रहार केला. मागासवर्गीयांसाठी सरकार नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह मान्यता या त्यांच्या क्रांतिकारक निर्णयांनी समाजाचा चेहरा बदलला. राजर्षी शाहू महाराजांचे जीवन म्हणजे सामाजिक समतेची गाथा आणि त्यांच्या कार्याचा प्रत्येक क्षण म्हणजे नवे आदर्श निर्माण करणारा प्रेरणास्त्रोत. राजर्षी शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे नव्हे, तर संपूर्ण भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते. त्यांची जयंती ही सामाजिक समतेचा आणि प्रगतशील विचारांच्या प्रेरणेचा दिवस असून, त्यांच्या या कार्याचा वारसा पुढील पिढीने आदर्श ठेवावा. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धाडसी निर्णयांमुळे आजही त्यांचा वारसा महाराष्ट्रभर प्रेरणादायी ठरतो.
जनतेचा राजा, न्यायाचा दीप..
समतेचा गंध, प्रगतीचा श्वास..
शिक्षणाचा झरा, श्रमाचा मान..
माणुसकीचा धर्म, शाहू महाराज..
छत्रपतींच्या छायेत..
सर्वांना समानतेची सावली..
शोषितांना दिला नवा उजेड..
सर्व समाजासाठी जिवंत प्रेरणा..
जयंतीनिमित्त वंदन करतो..
अखंड महाराष्ट्राचा अभिमान..
राजर्षीच्या विचारांनी उजळू दे..
आपली माती, आपली शान..