पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे : पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सावंतवाडी मध्ये रेझिंग डे कार्यक्रम संपन्न

पोलिस आणि नागरिकांमधील अंतर कमी होणे आवश्यक आहे. हेच आपल्याला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आपत्तीग्रस्तांना मदतीची तत्परता वाढवण्यासाठी मदत करेल असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक श्री ऋषीकेश रावले यांनी सावंतवाडी येथे झालेल्या ‘रेझिंग डे’ कार्यक्रमात केले.
व्यासपीठावर सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम राजे भोसले, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील भिती व दुरावा कमी करणे आणि एक विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करणे होता.
रुषीकेश रावले पुढे म्हणाले कि ज्या प्रकारे अनेक बाह्य देशांमध्ये पोलिस आणि नागरिक यांच्यात विश्वासाचं वातावरण आहे, तसेच आपल्या देशातही पोलिसांना एक आदर्श भूमिका मिळावी आणि नागरिक त्यांना सहकार्य करायला तयार असावेत, हे महत्त्वाचं आहे. रावले यांनी “ज्या प्रमाणे विदेशांमध्ये पोलिस आणि सामान्य व्यक्ती यांच्यात भिती नाही, तेच आपल्याकडे देखील घडले पाहिजे. पोलिसांबद्दल असलेली भिती दूर करण्यासाठी पोलिसांनी स्वतः नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. पोलिस हे लोकांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यासाठी काम करत आहेत, त्यामुळे पोलिसांकडून सन्मान मिळवणं हे नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले तसेच “जेव्हा आपण मदतीसाठी पुढे येतो, तेव्हा आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. पोलिसांसोबत काम करणे, त्यांच्याशी सहयोग साधणे, हेच आपल्या कर्तव्यात समाविष्ट आहे,” असे रावले यांनी सांगितले.