घरकुल साठी मिळणार ५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान

घरकुल साठी मिळणार ५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान


 

सिंधुदुर्गनगरी


 

   केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थींना 50 हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या 1 लाख 20 हजार रुपयांच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यातील 15 हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत 10 एप्रिलपर्यंत एक लाख 60 हजार 544 घरकुले बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहेत. पण, अनुदान कमी, मोफत वाळू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने 50 टक्के लाभार्थींची घरे अजून अपूर्ण आहेत. खुद्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सातारा जिल्ह्यातही 50 टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. दरम्यान, जिल्हा दरसूचीनुसार 269 चौरस फूट घरकूल बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च होतो. मात्र, घरकूल बांधणीसाठी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंतच अनुदान मिळत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर ग्रामविकास विभागाने वाढीव अनुदानाचा शासन निर्णय काढला आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकूल योजनेतील लाभार्थीनाही वाढीव अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य हिश्शातील वाढीव रक्कम असणार आहे. या निर्णयामुळे अपुऱ्या अनुदानामुळे थांबलेली घरकुले पूर्ण होतील, अशी आशा आहे.घरकूल लाभार्थींना आता मूळ अनुदान 1 लाख 20 हजार रुपये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 90 दिवसांच्या मजुरीपोटी 27 हजार रुपये व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीसाठी 12 हजार रुपये दिले जातात. आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार 50 हजार रुपये वाढीव मिळणार आहेत असे प्रत्येक लाभार्थीस आता 2 लाख 9 हजार रुपये मिळतील.घरकूल बांधकामासाठी लाभार्थीस पोलिस व महसूल प्रशासनाने कारवाईत जप्त केलेली वाळू व ज्या ठिकाणी लिलाव सुरू आहेत, तेथील वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण, अजूनही सुधारित वाळू धोरण निश्चित न झाल्याने शेकडो वाळू ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत. त्याचा देखील घरकुलांच्या कामांवर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य बेघर लाभार्थींना शासनाच्या त्या सुधारित धोरणाची प्रतीक्षा आहे.