लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू होणार नाही......पालकमंत्री नीतेश राणे यांचा शब्द

सिंधुदुर्गनगरी
शक्तिपीठ महामार्गासाठी बाधित होणाऱ्या "त्या" तेरा ही गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाचे काम सुरू होणार नाही. जमीन बाधितांना चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई रक्कम देऊन विकास करू, असा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. दरम्यान हे लोकांचे सरकार आहे. त्यामुळे पहिल्यांदा प्रश्न सोडवले जातील, पर्यायी मार्ग उपलब्ध होत असतील तर त्याचा विचार करू आणि हा प्रश्न सुटण्यासाठी माझ्यासह खासदार नारायण राणे आणि महायुतीतील सहकारी प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या भेटी घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात पुढील भूमिका ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती प्रमोद कामत, आंबोली सरपंच सावित्री पालयेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, दीपक नाटलेकर, कृष्णा गावडे, महादेव गावडे, गुरु सावंत, ग्रामस्थ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.या ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू होणार नाही. या जनतेने सरकारला निवडून दिले असून, हे सरकार जनतेचे आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बांदा बाजारपेठ बाधित होत असेल तर त्याचाही विचार केला जाईल. पर्यायी मार्ग उपलब्ध होत असेल तर त्याचाही विचार केला जाईल. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत या भागातील जनतेवर अन्याय होणार नाही, त्यांचे प्रश्न समजावून घेतले जातील, त्यांना विश्वासात घेतले जाईल, विकासाचे काम असल्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना अधिकची नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल ज्या ठिकाणी विकास आहे असा भाग वगळून पर्यायी मार्ग व त्याची पाहणी आपण करू चांगला निर्णय घेऊ व विकासाचा हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी दिली.