मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी. लोकसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात.

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी.  लोकसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात.

मुंबई.

  लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडला. तब्बल 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्याहस्ते झालं. यावेळी, पंतप्रधानांनी मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचं म्हटलं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न असल्याचं मोदींनी म्हटलं. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर, राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. यावेळी, मुख्यमंत्र्‍यांनी आवर्जून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचं म्हटलं. यावेळी, भाषण करताना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. येथील 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे. मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा लोकांनी आमचं स्वागत केलं आहे, एनडीए सरकारचं स्थिरता देऊ शकते हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पटीने अधिक काम करणार आहे. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझं स्वप्न आहे, असे मोदींनी म्हटले.
   गेल्या एका महिन्यात मुंबई ही देश व विदेशातील गुंतवणूकदारांची साक्षीदार राहिली आहे, आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. लोकांना माहिती आहे, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, मी तिसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हा सांगितले होते. आम्ही तिप्पट वेगाने काम करु, आज आपण हे होताना पाहत आहोत. महाराष्ट्राजवळ गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्रात सशक्त वर्तमान आहे, आणि महाराष्ट्राजवळ समृद्ध विकासाचे स्वप्न आहे. महाराष्ट्राचा विकसित भारतात मोठा वाटा आहे, महाराष्ट्रात उद्योग, शेती, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. म्हणून मुंबई ही पॉवर हब आहे, महाराष्ट्राला जगाचे सर्वात मोठे आर्थिक पॉवर हाऊस तयार करायचे आहे, मुंबईला जगाचे फिनटेक कॅपिटल करण्याचे माझे स्वप्न आहे, असे म्हणत मोदींनी मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे स्वप्न बाळगल्याचे म्हटले.