मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

वेत्ये

 

     मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये येथे शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. बोलेरो पिकअप आणि मारुती सुझुकी एर्टिगा कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत बोलेरो वाहन रस्त्यावरच पलटी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वेत्ये येथे हा अपघात घडला. एक बोलेरो पिकअप वाहन महामार्ग ओलांडत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एर्टिगा कारने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बोलेरो पिकअपचा ताबा सुटला आणि ते वाहन महामार्गावरच आडवे पलटी झाले.अपघाताचा आवाज प्रचंड मोठा असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वेत्ये गावचे सरपंच गुणांजी गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. सुदैवाने, या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील चालक व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.जरी जीवितहानी टळली असली, तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बोलेरो पलटी झाल्यामुळे आणि कारची समोरून धडक बसल्यामुळे दोन्ही गाड्यांचे सुटे भाग रस्त्यावर विखुरले होते.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. मात्र, उशिरापर्यंत या अपघाताची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. महामार्गावर वाहने ओलांडताना वेगावर नियंत्रण असणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.