डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा; तर तिघांची निर्दोष मुक्तता.

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा; तर तिघांची निर्दोष मुक्तता.

पुणे.

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयंचा दंड ठोठावला आहे. तर तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. ज्यांच्यावर कट रचल्याचा आरोपा होता त्या वीरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
   तब्बल १० वर्षानी दाभोलकर प्रकरणात दोन आरोपींना शिक्षा झाल्याने दाभोलकर कुटुंबाने समाधान व्यक्त केलं असलं, तरी तिन्ही निर्दोष आरोपींविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये  ओंकारेश्वर मंदिराजवळ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला होता. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. विचारवंताची हत्या झाल्याने पुरोगामी आवाज शोकसागरात बुडाला होता.
   दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे शरद कळसकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर हत्या, गुन्ह्याचा कट रचणे, युएपीए अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. संजीव पुनाळेकरांविरोधात पुरावे नष्ट करणे, खोट्या सूचना देणं अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी आरोप फेटाळले होते.  दाभोलकर हत्या प्रकरणात साक्ष नोंदवताना सीबीआयकडून महत्वाच्या साक्षीदाराला हजर करण्यात आले होते. सफाई कर्मचाऱ्याने 19 मार्च 2022 रोजी दाभोलकर हत्या प्रकरणात सुनावणीमध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला साक्षीदारानं ओळखले होते.दोघांनी दाभोलकरांवर गोळीबार करून फरार झाल्याची साक्ष पुणे महापालिकेच्या त्या सफाई कर्मचाऱ्याने दिली होती. आरोप निश्चित झाल्यानतंर 2021 पासून खटल्याची सुनावणी सुरु झाली होती. सुनावणीमध्ये 20 साक्षीदार तपासण्यात आले होते.
   दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आरोपी सापडत नसल्याने केतन तिरोडकर यांनी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी न्यायालयात जनहित याचिकेत केली होती. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात कर्नाटकमध्ये एटीएसने अमोल काळेला ताब्यात घेतले होते. काळेच्या तपासात नालासोपाऱ्यातील वैभव राऊतची माहिती मिळाली होती. वैभवच्या घरात शस्त्रास्त्रे सापडली होती. वैभवच्या तपासात शरद कळसकरला ताब्यात घेण्यात आले होते. पुढे पोलिसांच्या तपासात कळसकरने सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबूली दिली होती.