जनावरांतील लंपी स्किन आजाराबाबत पशुपालकांनी घ्यावयाची काळजी.

जनावरांतील लंपी स्किन आजाराबाबत पशुपालकांनी घ्यावयाची काळजी.

सिंधुदुर्ग.

    लप्मी चर्म रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातल CapriPox या प्रवर्गात मोडतात.या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात.या विषाणूचे शेळ्या मेंढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही.हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. या आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेषा संकरित जनावरांना लागण होण्याची जास्त शक्यता असते.
   संक्रमण झाल्यानंतर 1 ते 2 आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो व त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. संक्रमित जनावरांचे विविध स्त्राव, डोळ्यातील पाणी, नाकातील स्त्राव, लाळ इत्यादीमधून चारा व पाणी दुषित होवून जनावरांना या आजाराची लागण होते. विर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोग याव्दारे ही याची लागण होऊ शकते. तसेच या आजाराचा प्रसार बाह्यकीटकांव्दारे (डास, माश्या,गोचीड इ.) ही होतो. त्वचेवरील खपल्यामध्ये हा विषाणू अंदाजे 18 ते 35 दिवस जिवंत राहतो.
   लम्पी चर्म रोग या रोगामध्ये जनावरांना ताप येवून त्वचेखाली विशषत: डोके, मान, पाय,कास इ. ठिकाणी गाठी येतात. तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळत राहते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते. डोळ्यांमध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. पायास सूज येते.
    हा रोग संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करीता प्रतिबंधात्मक उपायोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरीता पशुपालकांनी खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे.
   बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे, गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे लंपी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा. बाधित गावामंध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरीता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणची परिसरात फवारणी करावी. त्याकरीता 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2-3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करता येईल.
   या रोगाने ग्रस्त जनावारांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्यात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. सदर रोगाचा प्रसार बाह्यकीटकांव्दारे (डास, माश्या, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी. रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असल्याने सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करुन घ्यावे. रोग प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी –विक्री थांबवावी.
   योग्य त्या जैवसुरक्षा उपयोजनांची अंमलबजावणी बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात 100 टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.
   या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पशुपालकांना कळविण्यात येते कि, या रोगाची लक्षणे पशुधनामध्ये आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्र. 18002330418 तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयातील कॉल सेंटर क्र. 1962 वर त्वरीत दूरध्वनी करुन याची माहिती द्यावी. प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 च्या कलम 4 (1) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था, ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमुद कायद्याशी सलग्न असणाऱ्या अनुसूचित रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थिती ची माहिती नजीकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकार असल्याची नोंद घ्यावी.
लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव उद्भवल्यास त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरीता राज्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.