अहिल्यादेवी विकास ट्रस्टचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल - आयपीएस बिरदेव डोणे

सिंधुदुर्ग
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व उल्लेखनीय ठरेल. विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड जिल्ह्यातील डोंगरी भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आयपीएस बिरदेव डोणे यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.आयपीएस बिरदेव डोणे यांनी नको बुके नको हार फक्त वह्या पुस्तके आणा असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्यांदा कराडच्या अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप बिरदेव डोणे यांच्या शुभहस्ते केले. या ट्रस्टचे कार्य गेली अनेक वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दुर्गम भागात सुरू आहे.यावेळी बिरदेव डोणे म्हणाले की, आजही गोरगरीब वंचित घटकातील डोंगर दऱ्या-खोऱ्यातील मेंढपाळ यांची मुल शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. कितीही संकटे आली तरी जिद्द चिकाटी आणि मेहनत घेऊन यश मिळवता येते. आजही बहुजन समाज शिक्षणापासून वंचित आहे. आजही पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. त्यासाठी कराडचे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे माध्यमातून शैक्षणिक चळवळीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे ही उल्लेखनीय कामगिरी आहे. मी अहिल्यादेवी ट्रस्टचे नाव ऐकुन होतो. अहिल्यादेवी ट्रस्ट नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आहे.कोरोनासारख्या महाभयंकर संकट काळात ट्रस्टने डोंगर दऱ्या-खोऱ्यातील जंगलातील मेंढपाळ बांधव यांचे मुलांसाठी चांगले काम केले आहे. आपण सर्वजण शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ. या बहुजन समाजातील जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी बनवण्यासाठी नजीकच्या काळात काम करुया यासाठी अहिल्यादेवी ट्रस्टला सर्वोतोपरी सहकार्य करु शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ते गुरगुरायला लावते म्हणुन शिक्षणाची कास धरून आपली प्रगती साधली पाहिजे. तरच समाजाचा विकास होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, बाळासाहेब पुकळे, डॉ मच्छिंद्र गोरड, प्रा. हेमंत पुकळे, संजय कात्रट, लता पुकळे, प्रा. स्वाती वाघमोडे, गजानन हुलवान, सतिश थोरात, आकाश हुलवान अनिल हुलवान, विजय माळकर, पुनम पुकळे अभिनंदन हराळे, पांडुरंग गावडे, योगिता घुले, अनिल हजारे, अमर गोरड, नरेश डोणे विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.