कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

कुडाळ 

 

            जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर, तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील माझ्या बांधवांसाठी मी तिथे गेलो होतो. त्यामुळे पोचण्यास वेळ झाला, एकीकडे ते संकट असताना, केवळ कोकणाविषयीच्या प्रेमाखातर कोकणी जनतेसमोर नतमस्तक होण्यासाठी मी इथे आलो.आमदार निलेश राणेंचे प्रेम आणि त्यांचा आग्रह एवढा मजबूत होता की, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे यावेच लागले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणाने नेहमीच शिवसेनेला प्रेम दिले आहे. त्यामुळे कोकणी माणसासाठी काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी केले. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभेत कोकणातील आठ जागा शिवसेनेला देऊन उबाठाचा सुफडा साफ केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आलो आहे. अख्या कोकणातून उबाठा हद्दपार केली. खऱ्या अर्थाने शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने कोकणात फडकला आहे. त्यामुळे मी तुमचे आभार मानण्यासाठी इथपर्यंत आलो, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, कोकणातील जनतेच्या प्रेमाखातर कुडाळमध्ये हजेरी लावली. कुडाळ बस स्थानक परिसरात आयोजित आभार सभेत बोलताना त्यांनी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कोकणातील जनतेच्या प्रेमाखातर आपण येथे आल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले, नारायण राणेंनी कोकण घडवले, सेना घडवली, तरीही त्यांचे पंख छाटण्याचे काम कोणी केले, ते तुम्हाला माहित आहे.आमदार निलेश राणे यांच्या कणखर नेतृत्वाचे कौतुक करताना ते म्हणाले, बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या खा. नारायण राणेंचा मुलगा असलेले आमदार निलेश राणे हे तेवढेच कणखर आहेत. स्वाभिमानाने पेटून उठणारा तो शिवसैनिक आहे. मात्र, शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यापासून त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. ते कोकणातील फणसासारखे आहेत. बाहेरून कितीही कठोर दिसत असले, तरी आतून मुलायम व गोड.तुम्हीही माझ्यासाठी उशिरापर्यंत थांबलात. शिवसैनिकांचे हे प्रेम कधीही विसरणार नाही. या जिल्ह्याच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना शिंदे म्हणाले, सर्वात आधी या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेले २७ जण हे आपल्या राज्यातील आहेत, काश्मीर पाहायला गेलेल्या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला.खर म्हणजे हे एक प्रकारचे बलिदान होते. त्यांनी पुढे सांगितले की, आणखी देखील अनेक महाराष्ट्रातील पर्यटक तिथे अडकले होते. खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पहिल्याच दिवशी आपली टीम तिकडे पाठवली होती. अभिजीत दरेकर आणि राजेश कदम हे प्रत्येक ग्रुपच्या माणसांशी माझी चर्चा करून देत होते. मी त्यांच्याशी बोलत होतो, परंतु ते बोलत असताना त्यांच्या मनामध्ये भीती मला जाणवत होती. एक भीतीचे वातावरण तिकडे निर्माण झाले होते आणि प्रत्येकाच्या बोलण्यात आपण सुरक्षितरित्या लवकर कसे आपल्या घरी जाऊ, याची ओढ होती. त्यांचे नातेवाईक देखील इकडे चिंतेत होते. जिथे संकट येत, तिथे आपत्ती येते. मग कोल्हापूर असेल, सांगली असेल, महाड असेल, चिपळूण असेल, खेड असेल किंबहुना केरळ असेल, उत्तराखंड असेल, मला राहावल नाही आणि सरळ मी श्रीनगरला गेलो आणि सोबत एकटा विमान घेऊन गेलो नाही, तर पाच विमाने तिकडे घेऊन गेलो.अशा कठीण परिस्थितीत लोकांना जेव्हा आपला माणूस भेटतो, तेव्हा त्यांना एक आधार वाटतो. संकट समयी त्या ठिकाणी जायच नाही, तर मग कधी जायच? हा केवळ काही पर्यटकांवर हल्ला नसून, हा आपल्या देशावर हल्ला आहे. त्यामुळे त्याला करारा जबाब मिळणारच, जशास तसे उत्तर मिळणार हा नवा भारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे की, पाकिस्तानला घडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, धर्म विचारून गोळ्या घातल्या, म्हणून ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे. यांना योग्य ते उत्तर देण्याचा निर्णय घेतला असून, आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. कोकण विकासावर भर देताना शिंदे म्हणाले, लोकांचा सर्वांगीण विकास हे भविष्य नसून, आता आपल्याला ते वर्तमानात बदलायच आहे. आज सगळीकडून या शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू आहे. मी एक शाखाप्रमुख या राज्याचा मुख्यमंत्री झालो, तर नारायण राणे हे देखील मुख्यमंत्री झाले. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झालेला काही लोकांना आवडत नाही. आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो, तरीसुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून अडीच वर्षांचे कामकाज पहा, आता पुन्हा आपली दुसरी इनिंग सुरू झाली आहे. आम्ही जनतेसाठी काम करत आहोत. पदाचा हव्यास आम्हाला नाही. पद येतात व जातात.माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. लोकांना घरात बसलेला नाही, तर लोकांच्या दारात जाऊन काम करणारा कार्यकर्ता आवडतो. बाळासाहेब म्हणायचे, घरात नाही, तर लोकांच्या दारात जाऊन संवाद साधणारा काम करणारा कार्यकर्ता मला पाहिजे आणि म्हणून जनतेला देखील जनतेमध्ये मिसळून काम करणारा नेता पाहिजे. शेतावर जाणारा, बांधावर जाणारा, लोकांची गाऱ्हाणी ऐकणारा नेता लोकांना हवा. त्यामुळेच मला एवढा अभिमान आहे की,जगाच्या पाठीवर असा कुठलाही मुख्यमंत्री नसेल की, कोणी माझ्याकडे पत्र घेऊन आला, गर्दीत मी असलो, तरी त्याच्या त्या पत्रावर सही केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. आज कोकण समृद्ध होत आहे. कोकणी माणसाने आता आपले कोकणाचे देखील मार्केटिंग करायला शिकले पाहिजे "येवा कोकण आपलोच आसा" असे म्हटल्यावर कोकणात आलेला माणूस पर्यटनासाठी पुन्हा पुन्हा आला पाहिजे, यासाठी आपण काम केले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. त्याच कोकणातले आमदार असलेले उदय सामंत आज उद्योग मंत्री आहेत. त्याच्या माध्यमातून या भागामध्ये उद्योग येत आहेत, त्याला चालना देण्याचे काम आपण करतोय, या लाल मातीमध्ये काजू, आंबा, कोकम यांसारख्या स्थानिक निसर्ग संपत्तीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे आहेत. इथल जेवण है कोकणचे वैशिष्टय आहे. असे जेवण जगात कुठेही मिळत नाही. इथे उकडीचा मोदक मिळतो. पण कोकणातल्या मोदकाची चव कुठेच नाहीये. कारण फक्त खोबरे आणि गुळ घालून मोदकाला चव येत नाही, त्याला आमच्या लाडक्या बहिणींचा हात लागलेला आहे. याच लाडक्या बहिणींनी आपली ही कोकणी चव पर्यटकांना चाखण्यासाठी त्या दृष्टीने उद्योग उभे करावेत, असे आवाहन त्यानी केले.कोकणामध्ये आपण कोस्टल रोडचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाकडे आला आहे. जिथे रस्ते झाले तिथे विकास आला आणि म्हणूनच या ठिकाणी कोकणासाठी जेवढे देता येईल, तेवढे आम्ही भरभरून देत आहोत. यासाठीच कोकण विकास महामंडळ प्राधिकरण केले आहे. त्याला देखील आपली ताकद द्यायची आहे, असे ते म्हणाले. काही जण माझ्यावर रोज उठून टीका करतात. मात्र, मी त्यांना कागदातून उत्तर देणार आहे. अडीच वर्षात ४०० कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केले. हे पैसे लोकाचे आहेत. त्यांचा जीव वाचला पाहिजे. आपल्याला हजारो लोकांना मदत द्यायची आहे. आपल्या सरकारने शासन जनतेच्या घरात नेले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून या महाराष्ट्रातल्या पाच कोटी लोकांना फायदा झाला, असे त्यांनी सांगितले. मी निलेश राणेंचे मनापासून अभिनंदन करीन की, शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्यापासून त्यांनी इथे शिवसेना वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आज मला कितीही त्रास झाला,किती अडचणी आल्या, तरी उशीर होऊनही मी इथे आलो. माझा पायलट विमान तिथपर्यंत पोहोचणार नाही, असे म्हणत होता. मात्र, मी कोणत्याही परिस्थितीत मला तिथे जायचे आहे.हे ठामपणे सांगितले व तुमच्या प्रेमाखातर इथपर्यंत आलो. मला वाटले मी पोहोचू शकत नाही. परंतु निलेश राणेंचे प्रेम आणि त्यांचा आग्रह एवढ़ा मजबूत होता की, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला इथे यावेच लागले. कार्यबाहुल्यामुळे इथे येण्यास उशीर झाला. मात्र, पुढच्या वेळी वेळेच्या आधीच पोहोचेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खासदार नारायण राणे हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. ते केंद्रात आहेत. ते तुमच्यासोबत आहेत व राज्यात मी तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे. आपला स्वार्थ काही नाही. सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आनंद आणणे, सुख आणणे हाच आमचा सर्वांचा आनंद आहे. त्यामुळे खंबीरपणे त संयमाने काम करत रहा. तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणेंना दिला.यावेळी त्यांनी निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक केले.