शिक्षक भरती प्रक्रियेत खोटी, चुकीची माहिती दिल्यास होणार थेट कारवाई

शिक्षक भरती प्रक्रियेत खोटी, चुकीची माहिती दिल्यास होणार थेट कारवाई

मुंबई


 

        शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवाराने पवित्र पोर्टलवर खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आली किंवा प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून योग्य त्या शिक्षेस पात्र असेल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या  संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा सुरू केली आहे. २ मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार असून, मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय आणि या दोन्ही प्रकारात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत. उमेदवारांना मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम निवडता येतील. मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या पदासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम तयार करून ते अंतिम करणे बंधनकारक आहे. प्राधान्यक्रम अंतिम न केलेले उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत.उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर पात्रतेनुसार प्राधान्यक्रम असल्याची खात्री करून घ्यावी. सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम अंतिम केल्यास निवडीसाठी, मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. प्राधान्यक्रम अंतिम केल्यावर त्यांना त्यात बदल करायचा असल्यास दिलेल्या मुदतीत प्राधान्यक्रम रद्द करून पुन्हा प्राधान्यक्रम तयार करून अंतिम करता येतील. या सुविधेचा वापर जास्तीत जास्त तीन वेळा करता येणार आहे. प्राधान्यक्रम अंतिम करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, असे नमूद केले आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी ते बारावी हे इयत्ता गट, अध्यापनाचे विषय, समांतर आरक्षणासह आरक्षण, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी प्राप्त केलेले गुण, उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे. स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.