पहलगाम हल्ल्याच्या दुखवट्यात शिंदे शिवसेनेकडून कुडाळात आभार सभा- विनायक राऊत

पहलगाम हल्ल्याच्या दुखवट्यात शिंदे शिवसेनेकडून कुडाळात आभार सभा- विनायक राऊत

 

कणकवली

 

      पहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात दुखवटा असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीवर्धन ते कुडाळ पर्यंतच्या प्रवासात जल्लोष साजरा केला. एवढेच नव्हे तर कुडाळच्या सभेनंतर कणकवलीत कोंबडीवडे आणि दारू पार्टी करण्यात आली अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मधुरा पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके, सी. आर. चव्हाण आदींसह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
           राऊत म्हणाले की, दहशतवादी हल्ल्याला तीन दिवस झाले नसतानाही कोकण दौऱ्यात जल्लोष करायचा आणि त्यानंतर दारु पार्ट्या करायच्या ही राज्यसरकारची प्रवृत्ती आहे. कुडाळच्या आभार सभेत रात्री ११.३० नंतर कणकवलीत कोंबडी वडे व दारु पार्टी करण्यात आली. त्याचे फोटो आमच्याकडे आहेत. या पार्टीत कणकवलीतील काही बाडगे लोक होते. या पार्टीचा खर्च पालीच्या उद्योगपतीने केला आहे.पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर २२ एप्रिलला हल्ला करण्यात आला. यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील ६ जण आहेत. या हल्ल्याचा देशात सर्वांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरा सोडून आले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगामला भेट देऊन आले. या हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत निषेध केला. दहशतवादाविरोधात एकमुखाने लढण्याचे ठरवले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी संवेदनशीलता सोडून कुडाळ येथील आभार सभेत जल्लोष साजरा केला. शिंदे हे श्रीवर्धन ते गोवा आणि गोवा ते कुडाळ असा प्रवास करत कुडाळच्या आभार सभेत हार, तुरे स्वीकारत जल्लोष केला. त्यांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो.आभार सभेदिवशी ४०० लोकांच्या उपस्थितीत प्रचंड मोठी सभा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाचा डांगोरा पिटण्याचा काम केले. आ. निलेश राणे यांनी भीष्मप्रतिज्ञा करत मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात राहणार असे जाहीर केले आहे. परंतु ज्या बाळासाहेबांनी नारायण राणे व त्यांच्या मुलांना राजकीय व्यासपीठ दिले. त्या शिवसेनेशी राणेंनी गद्दारी केली. ज्या काँग्रेसमध्ये राणेंना मंत्री पदे दिले. त्यांचा पक्ष संपवण्याचा इशारा दिला होता. भाजपाने राणे पित्रा-पुत्रांना राजकीय स्थिरता दिली. मात्र, आ. निलेश राणे भाजपशी एकनिष्ठ राहिले नाहीत. आयत्या उमेदवारीसाठी पक्ष सोडला, त्यासारखा विनोद होऊ शकत नाही. लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्र्यांनी मेडिकल कॉलेज दिले. त्याची अधोगती सुरु आहे. या मेडिकल कॉलेजमधील एकनाथ शिंदे हे शेकडो रिक्त पदे भरणार आहे का? केवळ कोकणाच्या नावाने गळा बाहेर काढायचा आणि जनतेची दिशाभूल करायची हाच त्यांचा कार्यक्रम आहे, असा आरोप राऊत यांनी केला.